हेडलेस काँग्रेस आता ब्रेनलेस झाली आहे – मुख्तार नक्वी

0
385

दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – लोकसभेत काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हेडलेस असलेली काँग्रेस आता ब्रेनलेसही झाली आहे, अशी खरमरीत टिका केली आहे. काँग्रेस नेते चौधरी यांनी सरकारला , “तुम्ही कलम ३७० ही अंतर्गत बाब असल्याचे म्हणता पण यावर १४४८ पासून संयुक्त राष्ट्र नजर ठेऊन आहे. मग ही अंतर्गत बाब झाली का? आपण शिमला करार केला, लाहोरचा करार केला. या गोष्टी अंतर्गत होत्या की द्विपक्षीय होत्या?,” असा प्रश्न विचारला होता. यावरून नक्वी यांनी काँग्रेसवर तोफ डागली.

चौधरी यांच्या वक्तव्यावर बोलताना नक्वी म्हणाले की, तुम्ही असे कसे म्हणू शकता की काश्मीर भारताचा अविभाज्य घटक नाही व तो आपला अंतर्गत विषय नाही? पराभवामुळे खचलेली काँग्रेस आता मानिसकरित्या देखील दिवाळखोरीत निघाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी सभागृहात होते मात्र कोणीच चौधरींना थांबवले नाही. काँग्रेसकडे इतिहासात केलेल्या चुका सुधारण्याची संधी होती, मात्र त्यांच्याकडून आता चुकांमध्ये भर घातली जात आहे. कलम ३७० हटवण्यात आल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही नकवी यांनी यावेळी म्हटले.