बीड, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादीला गळती वगैरे काही लागलेले नाही. हा तर राजकीय भ्रष्टाचार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार जर भाजप करत असेल, तर तो सत्तेचा गैरवापर आहे, असे शरसंधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी साधले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे म्हणाले की, भाजपचे शतप्रतिशत यश हेच आहे का? दुसऱ्या पक्ष्याचे आमदार किंवा इतर पदाधिकारी फोडणे याचाच अर्थ भाजप स्वतःला जे शत प्रतिशत समजते, हे साफ खोटे आहे, असे मुंडे म्हणाले. सध्या सुरू असलेले राजकारण कुठल्याही राजकीय पक्षाने केले नव्हते. ते राजकारण आज भाजप-शिवसेना करत आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही.
कुणी कुठल्या कारणाने आमच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकला , हे येणाऱ्या काळात उघडकीस येईल. शिवसेना-भाजप ने जे काही आमिष दाखवून जे काही केले. त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. या बरोबरच राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील हा पक्ष जमिनीवर पाय जखडून आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.