नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सादर केलेला हंगामी अर्थसंकल्प केवळ ट्रेलर आहे. निवडणुकीनंतर आम्ही भारताला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ , अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. गरीबांना शक्ती देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा आणि श्रमिकांना सन्मान देणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्था आणि देशाचा विश्वास बळकट करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत मोदींनी स्तुतीसुमने उधळली आहेत.
देशासमोरील पुढील दशकभराच्या गरजा लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात योजनांचा समावेश केला आहे. या अर्थसंकल्पातून देशातील १३० कोटी जनतेला ऊर्जा मिळेल. हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक बजेट आहे. आमचे सरकार प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहाशी जो़डण्याचा प्रयत्न करत आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले.
सरकारच्या योजनांमुळे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. आज देशातील ९ कोटी जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा लाभ मिळाला आहे. उज्वला योजनेतंर्गत ६ कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत दीडकोटी लोक स्वत:च्या पक्क्या घरांत राहू लागली आहेत, असे मोदी म्हणाले.