सांस्कृतिक क्षेत्रात काम करायला मोठी संधी; योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर गिरीश बापटांची प्रतिक्रिया

0
231

पुणे,दि.०१(पीसीबी) – बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे, असं विधान बापट यांनी केलं आहे.

बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा सवाल बापट यांना करण्यात आला. तेव्हा, योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं झाली तर आनंद व्यक्त करायला हवा, दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही. योगी आदित्यनाथ यांच उत्तर प्रदेशातलं काम हे अभिनंदनीय आहे, असं बापट म्हणाले.

दरम्यान त्यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवरही टीका केली. हे अपयशी सरकार आहे. कोरोनाच्या कामातही हे सरकार अपयशी झाले असून ठाकरे सरकार सपशेल नापास झाले आहे. हे सरकार पाडण्याची गरज नाही. सरकार आपल्याच वजनाने आपोआप पडेल, असा दावाही त्यांनी केला. पदवीधरांच्या निवडणुकीपासून राज्यात नव्या परिवर्तनाला सुरुवात होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.