सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का? – विनायक मेटे

0
218

मुंबई,दि.१३(पीसीबी) – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे उद्या काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही मराठा नेत्याने केलेली नाही. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत आहेत. सरकारला मराठा समजााला आरक्षण द्यायचं नाही का? ओबीसींचे मोर्चे, आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत का? तसेच सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का? असा सवाल विनायक मेटे यांनी केला आहे.

दरम्यान मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसींमधून आरक्षण मागितलेलं नाही. पण ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्री आणि राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मोर्चे, आंदोलनंही सुरू केली असून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी नेत्यांचे हे मोर्चे, मेळावे सरकार पुरस्कृत आहेत का? राज्यातील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असून सरकारने त्यांच्यावर कोणताही अंकूश ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील वातावरण खराब करण्याचा निर्णय घेतला आहे का? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे का? अशा प्रश्नांच्या फैरीही मेटे यांनी झाडल्या.