बीड, दि.२४ (पीसीबी) – सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्याचा रद्द केलेल्या निर्णयाबाबत ग्रामविकास मंत्री आणि सरपंच परिषदेबरोबर बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
भाजप-शिवसेना सरकारने काही वषार्ंपूर्वी सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचे चांगले परिणाम राज्यभर दिसून आले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने नागपूर अधिवेशनात सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय रद्द केला. याबाबत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी ग्रामविकास मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन या निर्णयाबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांनाही याबाबत सरपंच परिषदेने निवेदेन देऊन चर्चा केली. त्यामुळे सरकारकडून या निर्णयातील त्रुटीचा अभ्यास करुन परत सरपंचाची निवड जनतेतून घेतली जाईल, अशी आशा सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी व्यक्त केली. यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल गित्ते, परिषदेचे अविनाश आव्हाड, विकास जाधव, राजाराम पोतनीस, जितेंद्र भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.