शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे – धनंजय मुंडे

0
496

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बुधवारी धुळे दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना  स्थानबध्द करण्यात आले होते. यावर  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दौऱ्यात अडथळा नको म्हणून शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे आहे, असे टीकास्त्र धनंजय मुंडे यांनी सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धर्मा पाटील यांच्या पत्नी सखूबाई आणि मुलगा नरेंद्र या दोघांना दोंडाईचा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस दोंडाईचा परिसरातून निघून गेल्यानंतर सखूबाई व नरेंद्र पाटील यांना पोलिसांनी सोडून दिले होते.

मात्र, नरेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यामधून परत जाण्यास नकार दिला.  मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात आपण कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नव्हतो. तरीही मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस ठाण्यात विनाकारण बसवून ठेवण्यात आले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक मंत्री  दौऱ्यावर येतील, तेव्हाही मला आणि माझ्या कुटुंबियांना अशाच त्रास दिला जाणार का? असा सवाल  नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला होता.