शिवसेनेच्या समर्थनावरून आघाडीतच जुंपली

0
358

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढला आहे. त्यातच भाजपाने नकार दिल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. परंतु २४ तासांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र त्यांना सादर करता आले नाही. त्यातच आता झालेल्या उशीरावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचे म्हटले. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे समर्थन देता आले नसल्याचे म्हटले.

राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करता आले नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे. परंतु पत्र देण्यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्राने काहीही झाले नसते. आम्हीदेखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्याने दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणे अपेक्षित होते. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असे पवार यावेळी म्हणाले.

तर दसुरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भाजपाने आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.