“आज बाळासाहेब असते तर त्यांना दु:ख झाले असते”

0
408

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढला आहे. अशातच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. आज शिवसेनेला हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांसोबतप जात असल्याचे पाहताना बाळासाहेबांना दु:ख झाले असते, असे ते म्हणाले.

शिवसेनेला हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांसोबतप जात असल्याचे पाहताना बाळासाहेबांना आणि शिवसैनिकांना दु:ख झाले असते. बाळासाहेबांनी सर्वांना एकजुट केले आणि काहींनी सर्वांना वेगळे केले याची इतिहास साक्ष देईल, असे सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. शिवसेना आणि भाजपाने युतीमध्ये निवडणुका लढवल्या होत्या. तसेच शिवसेना-भाजपा युतीला बहुमतही मिळाले होते. परंतु शिवसेना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि समसमान सत्तावाटपाच्या आपल्या मागणीवर ठाम होती. त्यातच भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांची युती तुटली.

२४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच यापूर्वीच भाजपाने आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.