शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या कागदी होड्या शरयू नदीत आढळल्या

0
809

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर काही कागदी होड्या  आढळून आल्या आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आरती झाल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयू नदीमध्ये टाकल्या आणि त्याच होड्या आज (रविवार)  सकाळी नागरिकांना सापडल्या आहेत, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर  टीका करताना विखे- पाटील म्हणाले की, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला  म्हणाले होते की, निर्लज्जांनो राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? त्यामुळे अयोध्येला गेल्यानंतर ते आता राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ करून मुंबईला परत येतील,  असाच अनेकांचा समज झाला होता. मात्र, ते सहकुटुंब  तीर्थयात्रा करून आले आहेत.

मंदिर बांधण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी केंद्र सरकारलाच सवाल केला की, राम मंदिर केव्हा बांधणार त्याची तारीख सांगा. अयोध्येत जाऊन शिवसेना पक्षप्रमुखांनी मी कुंभकर्णाला जागे करायला आल्याचे सांगितले. पण ते नेमके कोणाला कुंभकर्ण म्हणत आहेत? ते सरकारला कुंभकर्ण म्हणत असतील तर केंद्रात आणि महाराष्ट्रात  शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. ते स्वतः सत्तेत असताना सरकारला कसे जागे करणार आहेत ? असा सवालही विखे पाटील यांनी यावेळी केला.