विराट नंतर इन्स्टाग्रामवर रोहीत शर्माने अनुष्का शर्मालाही केले अनफॉलो

0
634

मुंबई, दि, ३१ (पीसीबी) – भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या प्रश्नांवर विराटने पडदा टाकला. त्याने पत्रकार परिषद घेऊन वाद आणि गटबाजीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. पण सोशल मिडीयावर मात्र या दोघांमधील वाद काहीसा विकोपाला गेल्याचे दिसून आले. विराटला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर रोहितने विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केले

पण आता मात्र या संदर्भात एक वेगळीच चर्चा दिसून येत आहे. रोहितने अनुष्काला अनफॉलो केल्यानंतर टीम इंडियाचे दोन शिलेदार मात्र तिला फॉलो करू लागले आहेत. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी अलीकडेच अनुष्का शर्माला ट्विटरवर फॉलो केले आहे.

के. एल राहुलला कसोटी, एकदिवसीय आणि टी २० अशा तीनही प्रकारात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही, तरीही विराट कोहलीचा त्याला पाठिंबा आहे. तसेच चहल IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळतो. त्यामुळे तोही विराटच्या जवळचा समजला जातो. त्यामुळे कोहलीच्या या दोन निकटवर्तीयांनी अनुष्काला फॉलो केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, रोहितने जेव्हा अनुष्काला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले, त्यानंतर अनुष्काने तिच्या इन्स्टा-स्टोरीमध्ये एक सूचक पोस्ट शेअर केली होती. ‘खोट्या देखाव्याच्या गोंधळात फक्त सत्यच शांततेशी हात मिळवू शकते,’ अशी पोस्ट अनुष्काने केली होती. विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघात फूट पडली असल्याची चर्चा आहे. रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंनी विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, विराट आणि रोहित यांच्यात वाद झाले असल्याचा दावा करण्यात येत होता. पण विराटने हा दावा फेटाळला आहे. पण रोहितने मात्र अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.