पुणे, दि. १७ (पीसीबी) – खंडणीसाठी अपहरण केलेल्या एका १५ वर्षांच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्याच्या तरुणानेच खंडणीसाठी या मुलाचे अपहरण करुन हत्या केली. वारजे-माळवाडी परिसरातील चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह पुरला होता.
निखिल अनंत अंग्रोळकर असे मृत विद्यार्थ्याचे नांव आहे. निखिलचे वडील अनंत अंग्रोळकर यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली होती. याप्रकरणी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खंडणीसाठी निखिलचे अपहरण केले होते. मात्र त्याने वडिलांना फोन करुन सांगितल्यामुळे हत्या करण्यात आली. दरम्यान, निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने निखिलची हत्या केल्याची कबुली दिली.
घटनेच्या दिवशी निखिलने वडिलांना फोन करुन आपल्याला जबरदस्तीने दुचाकीवरुन नेले असल्याची सांगितले होते. यामुळे घाबरलेल्या आरोपी बिनयसिंगने निखिलची हत्या करून त्याचा मृतदेह पुरून टाकला होता.