लोकसभेतील पराभव त्रुटींमुळे की ईव्हीएम घोटाळ्यामुळे ?; काँग्रेस करणार शहानिशा

0
372

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाचे  काँग्रेसकडून विश्लेषण केले जाणार आहे. काँग्रेसचा पराभव त्रुटींमुळे झाला आहे की ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाला आहे, याची शहानिशा काँग्रेस करणार आहे.  लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ३०३ तर काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या. एकेकाळी ३००हून अधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा इतका दारूण पराभव का झाला, याचे प्रत्येक मतदानकेंद्रानुसार विश्लेषण काँग्रेस करणार आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक २० मागवण्यात आला आहे.

फॉर्म क्रमांक २०मध्ये प्रत्येक मतदानकेंद्रावर उमेदवाराला किती मते मिळाली, याची तपशीलवार माहिती दिली असते.  प्रत्येक मतदानकेंद्रातील परिक्षेत्रात मतदानाआधी काँग्रेस सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेचे निकाल आणि उमेदवाराला मिळालेली एकूण मते याची चाचपणी काँग्रेस करणार आहे. जर दोन्ही आकड्यांमध्ये जास्त फरक नसेल, इतर काही कारणांमुळे मते कमी मिळाली असतील, तर संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष रणनीती आखणार आहे. पण जर या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास संबंधित मतदानकेंद्रांवर ईव्हीएम घोटाळा तर झालेला नाही, याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे.