मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेची युती होणारच, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकसभेआधीच युतीबाबतचा फॉर्म्युला फिक्स झाल्याचे सांगून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नांव न घेता टोला लगावला.
युतीच्या जागावाटपावर २०१४ मध्ये जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही. चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, असे विधान शिवसेना – भाजपच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याचा उध्दव ठाकरे यांनी पाटील यांचे नांव न घेता समाचार घेतला.
युतीचा निर्णय भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण घेणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच विधानसभेसासाठीचा फॉर्म्युला फिक्स झाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे इतर कुणाच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.