लॉर्ड्स कसोटीत झालेल्या चुका पुन्हा करणार नाही – विराट कोहली

0
1094

लंडन, दि. १३ (पीसीबी) – लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून भारताला एक डाव आणि १५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात एकाही डावामध्ये भारताला १५० धावांचा पल्ला गाठता आला नाही. यावर लॉर्ड्स कसोटी सामन्यात झालेल्या चुका पुन्हा करणार नाही आणि पुढच्या सामन्यांध्ये खेळामध्ये  सुधारणा करण्याचे आश्वासन भारताचा कर्णधार विराट कोहली यांने दिले आहे.

विराटला अर्धशतकही पूर्ण करता आलेले नाही. पाच दिवसाचा सामना इंग्लडने अवघ्या तीनच दिवसांत जिंकला. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या पराभवानंतर  सामन्यातील चुकांची जबाबदारी विराटने स्वीकारली आणि त्या चुका पुन्हा न करण्याचे आश्वासनही दिले.  हो या सामन्यात खूप चुका झाल्या. पण या चुका आम्ही पुन्हा करणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुका स्वीकारतं नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. यापुढील सामन्यात आम्ही आमचा खेळ नक्की सुधारू’ , असे विराटने म्हटले आहे.

दरम्यान, विराटने इंग्लंडच्या खेळाचे कौतुकही केले आहे.  इंग्लंडने या सामन्यात खरोखर उत्तम खेळी केली आहे. त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडच विजयाचा खरा मानकरी असल्याचे सिद्ध केले आहे.भारत आणि इंग्लंडदरम्यान पुढची कसोटी बर्मिंगहम येथे होणार आहे. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत ०-२ ने पिछाडीवर आहे.