लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले….

0
435

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : राज्यात एकीकडे करोना रुग्णसंख्या वाढत असताना ठाकरे सरकारकडून लॉकडाउन लावलं जातंय की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याची निर्देशही दिले होते. मात्र महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आनंद महिंद्रांसारख्या उद्योजकांनी लॉकडाउनला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना लॉकडाउनसंबंधी मोठं विधान केलं आहे.

“ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत तेव्हा वाढणारे रुग्ण, आपल्याकडे असणारी संसाधनं या सगळ्याचं आपण मोजमाप करत राहतो. वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरजच असते. त्यामुळे लॉकडाउन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाउन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

“लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“रुग्णसंख्या वाढणं चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

“मी अलीकडे जे पाहत आहे तिथे लक्षणं नसणाऱ्यांची काळजी वाटत नाही. पण ते होम कवारंटाइन असतात, बऱ्याच लोकांना छोटी घरं असतात. त्यामुळे ते आपल्यासोबत संपूर्ण घरालाही बाधित करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात नाही. उपचार होत नसल्याने मग त्यांची परिस्थिती बिघडते आणि त्या अवस्थे ते रुग्णालयात येतात. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची गरज त्यामुळे वाढली आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्य विभागालाही आवाहन केलं आहे की, ज्यांचं घर छोटं आहे, ज्यांना विलगीकरणात राहण शक्य नाही त्यांना सरळ सरकारी सीसीसी रुग्णालयात आणलं पाहिजे. होम आयसोलेशनमध्ये ठेवू नका, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हा एक महत्वाचा बदल झाला पाहिजे. लोकांनी तो पाळला पाहिजे,” असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

“आज तरी निर्बंध कडक करण्याच्याच सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या बेड्सची संख्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा कमी असते तेव्हा लॉकडाउनचा पर्याय नाही तर शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा लागतो. त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत. सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करत असतो. आपण कुठे कमी आहोत असा भाग नाही, पण जर आयसीयू आणि ऑक्सिजनच्या बेड्सचा परिणाम जाणवला तर लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागतो. पण त्याचा अभ्यास करावा लागत असून आमचा विभाग आणि मुख्यमंत्री याची चाचपणी करत आहोत. अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि जीवही वाचला पाहिजे त्यामुळे मध्यबिंदू गाठावा लागतो आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा लागतो,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कडक निर्बंध म्हणजे नेमकं काय करणार असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “जसं आपण सरकारी ऑफिसमध्ये ५० टक्के कर्मचारी घरुन काम करत आहेत तसंच खासगी कार्यालयांसाठीही करावं लागेल. त्यानंतर आपल्याला कदाचित रेस्तरॉ, चित्रपटगृह १०० टक्के बंद करावे लागतील का? गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या हेतूने या काही गोष्टी कराव्या लागतात. पण जर लोक शिस्त पाळणार असतील तर नियम पाळा, लॉकडाउन टाळा हे धोरणं आहे. नियम कडक पाळले, संख्या रोखू शकलो तर लॉकडाउनची गरज नाही”.

लसीकरणाविषयी बोलताना विनंती करत ते म्हणाले की, “आपण देशात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण आपल्याला गती वाढवायची आहे. पात्र लोकांच्या लसीकरणासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. सामाजिक आणि राजकीय संघटनाच्या कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रावर नेत मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच धर्तीवर आपण आपल्या ४५ वर्षापुढील लोकांना बाहेर काढून लसीकरण केलं पाहिजे. यामुळे गती वाढेल असा मला विश्वास आहे. आपलं देशप्रेम, राज्यप्रेम सिद्ध करावं”.