राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांनो घरवापसी करा; अजितदादा पवारांची साद

0
4291

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मागील निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून गेले आहेत, त्यांच्यासाठी अजूनही पक्षाची दारे उघडी आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व आमदार अजितदादा पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना साद घातली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक जुने सहकारी घरवापसी करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजितदादा गुरूवारी (दि. २७) डोंबिवलीतील एका कार्यक्रमासाठी गेले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा येण्याची साद घातली आहे.

अजितदादा म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा बेरजेचे राजकारण करणारा पक्ष आहे. मागील निवडणुकीत जे राष्ट्रवादीला सोडून गेले आहेत, त्यांच्यासाठी अजूनही पक्षाची दारे उघडी आहेत. मागच्या वेळी आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा होता, असे म्हणा आणि राष्ट्रवादीत पुन्हा या. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी कमकुवत असेल, अशा ठिकाणी जिंकण्याच्यादृष्टीने आम्ही इतर पक्षातूनही लोकांना राष्ट्रवादीत घेऊ. पण त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.”

अजितदादांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीला सोडून गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यात काय काय राजकीय घडामोडी घडणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.