राष्ट्रवादी घाबरली असल्याने काँग्रेसमध्ये विलीनकरण होणार – प्रकाश आंबेडकर

0
433

अहमदनगर, दि. १ (पीसीबी) – भाजपला  रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस घाबरली  आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये विलीनकरण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

काँग्रेसपासून मुस्लिम समाज  दूर होत चालला आहे. आता ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित अघाडीची सत्ता येणार  आहे, असा विश्वास आंबेडकर यांनी  यावेळी  व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीदिनाच्या निमित्ताने  डॉ. आंबेडकर यांनी चौंडी येथे भेट दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी आघाडीवर हल्लाबोल चढवला. प्रा. राम शिंदे यांनी घोंगडी देऊ न प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार केला.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर  वंचित बहुजन आघाडीच सत्तेत येईल. वंचित बहुजन आघाडी कोणत्याही एका घटकाला पुढे घेऊ न जाणारा पक्ष नसून यामध्ये तळागाळातील व सर्वसामान्य माणूस सत्तेत कसा येईल, हाच प्रामाणिक प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.