“राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल”

0
584

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र जयंत पाटील यांनी एक्झिट पोलचा अंदाज मोडीत काढत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळेल असा दावा केला आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता आपल्याला याची खात्री असल्याचेही सांगितले आहे. जयंत पाटील यांना यावेळी एक्झिट पोलच्या निकालांवर शंका व्यक्त केली. “एक्झिट तसेच ओपिनियन पोलमधील निष्कर्ष एकतर्फी असून काहीतरी गडबड असल्याचे,” त्यांनी म्हटले आहे. “एक्झिट पोलच्या माध्यमातून एकच बाजू वरचढ दाखवली जात असून, लोकांची त्याप्रमाणे मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा,” दावा त्यांनी केला आहे.

“मोठ्या फरकाने एकच बाजू निवडून येईल यासाठी लोकांची मानसिक तयारी केली जात असून यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास जागा आहे. सत्ताधारी पक्षाने शंकाचे निरसन करणे गरजेचे आहे,” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच निवडणूक आयोग सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वागत असल्याचा आऱोपही यावेळी त्यांनी केला.