“राज्यपाल करुणेचा सागर आहेत, याच करुणा भावनेने त्यांनी…”

0
445

मुंबई,दि.०२(पीसीबी) – मागील कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपाल भगतसिंह यांना महाराष्ट्रत रमावं वाटतं. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवून कित्येत महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकवेळा टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपधार्जीणे असल्याचं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा म्हटलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे मोठ्या मुश्किलीने 12 आमदारांच्या नावांवर एकमत झाले होते. त्यानंतर या नावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी सरकारची भूमिका राहिलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने राजभवनाशी अधिकृतपणे अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजूनही 12 आमदारांची यादी राज्यपालांच्या दफ्तरीच पडून आहे.