मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राज्यपालांचे अभिभाषण हे फक्त कागदावरचे भाषण आहे. या भाषणातील एकही गोष्ट प्रत्यक्षात आलेली नाही, असा आरोप करून विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आज (सोमवार) बहिष्कार टाकला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरूवात झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मध्यवर्ती सभागृहात अभिभाषण झाले. २०१४ पासून सेना-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून यावेळी पहिल्यांदाच राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्यात आला आहे.
गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है… आरएसएसचे समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनासमोर निदर्शने केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, दुष्काळ, आदी मुद्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.