मुंबई, दि.३१ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिसकटण्याची शक्यता आहे. छोट्या- छोट्या पक्षांची मोट बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी चौथी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागावाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी विरहीत नवी आघाडी उभी करण्याचे राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
हातकणंगले, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, वर्धा, धुळे, नंदुरबार, माढासह अजून ५ ते ६ जिल्ह्यांत उमेदवार स्वाभिमानीच्या संपर्कात आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी विविध पक्षातील नेत्यांशी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. तुपकर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. दरम्यान, इतर पक्षातील डावललेल्या बंडखोरांना गळाला लावून त्यांना उमेदवारी देण्याची रणनिती स्वाभिमानीने आखली आहे.