रविकांत तुपकरांनी साथ सोडल्यानंतर राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

0
519

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत संघटनेपासून फारकत घेतली आहे. तुपकर यांचा राजीनामा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार  राजू शेट्टी यांच्या  चांगलाच  जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. कारण राजू शेट्टी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट टाकत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. 

राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बहुतेक सर्वच राजकीय नेते व कार्यकर्ते सत्तेच्या दिशेने पळत सुटताना दिसत आहेत. जे येत नाहीत त्यांच्या मागे चौकशीची ईडापिडा लावली जाते. आर्थिक कोंडी केली जाते आणि त्यानांही नाईलाजाने भरती व्हावे लागते. अशा पध्दतीने महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहतोय काय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.देशातील राजकीय वाटचाल एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघालेली आहे. सत्ता कोणाचीही असो विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आधार असतो. तो आधारच काढून घ्यायच राज्यकर्त्यांनी ठरविलेले दिसते. अशा परिस्थितीमध्ये स्वाभिमानीच्या शिलेदारांनी सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात ऊतरून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

चळवळ करणे हे इतके सोपे राहिले नाही हे तुम्हाला चार वर्षात लक्षात आलेले आहेच. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाव्या लागतील ,खोट्या गुन्ह्यात आडकिवले जाईल कालपर्यंत बरोबर असणारा माणूस फोडून घेतील आपल्या विरोधात एवढेच ते करू शकतात आपण थोडेच ईडी , इन्कमटॅक्स , सी.बी.आय ला घाबरणारे आहोत? एकमेकांबद्दल गैरसमज पसरविणे, द्वेष निर्माण करणे यामध्ये त्यांची खासियत आहे. अशा या वादळात खवळलेल्या तुफान समुद्रात स्वाभिमानीचा दिवा घेऊन मी आपल गलबत समुद्रात सोडलेले आहे.दिवा विझू न देता जहाज किना-यावर न्यायच आहे. मोठमोठ्या लाटा येत आहेत किनारा येणार आहे कि नाही मला माहित नाही. पण लांब एक किना-यावरचा दिवा लुकलुकताना दिसतोय कदाचित आपण किना-यावर पोहचू किंवा मध्येच आपल्याला जलसमाधीही मिळेल काय होणार आहे मला निश्चित माहित नाही.मी या जहाजाचा कॅप्टन आहे. किनारा गाठण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे.

माझ नशिब या जहाजाशी बांधलेले आहे तेंव्हा भवितव्य अंधकारमय दिसत असताना जर कोणाच्या हाताला लाईफ जॅकेट लागले तर त्यांनी आवश्य त्याचा स्विकार करावा. त्यांना माझ्या शुभेच्छाच राहतील मात्र इतके दिवस एकत्र काम केल्यानंतर आपल्याच सहकार्यांना शिव्या शाप देत बसू नका. चळवळीमध्ये काम करणे न करणे ज्याच्या त्याच्या स्वेच्छेचा भाग असतो कुणी कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. माझे किंवा माझ्या सहका-यांचे काही निर्णय कदाचित चुकले असतील पण त्यामागे व्यक्तीगत स्वार्थ निश्चितच नव्हता व असणारही नाही. ३१ वर्षांपूर्वी स्वर्गीय शरद जोशींनी मोठ्या विश्वासाने माझ्या छातीवर लाल बिल्ला लावला. त्यावर निष्ठा ठेऊन माझी वाटचाल सुरू आहे व ती शेवटपर्यंत तशीच राहणार आहे. तेंव्हा ज्याला जमेल त्याने चळवळीत काम करावे जमत नसेल त्यांनी चळवळीस गालबोट लावण्याचे पाप करू नये. चळवळ हेच सामान्य माणसाचे आधार आहे. पेड न्यूजच्या जमान्यात माझा हा निरोप तुमच्यापर्यंत पोहचतोय काय नाही मला माहित नाही पण ज्याच्यापर्यंत पोहचेल त्यांनी पुढे पाठवावा सोशल मिडीयावर सुध्दा भाडोत्री ट्रोलचा सुळसुळाट झालेला आहे त्यामुळे विचलीत न होता आपल्या उद्दीष्टाच्या दिशेने चालत रहा.