मुंबई, दि. २ (पीसीबी) – मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी नको. मला दिल्लीचे राजकारण करायचे नाही, मी राज्यातच पक्षासाठी काम करेन, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करुन कळवले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुका आहेत. मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नसलो, तरी माझ्या राज्यात राहून पक्षासाठी मला काम करायचे आहे, असे ही चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, चव्हाण यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्याची सोनिया गांधींची इच्छा होती. परंतु त्यांनी आपल्याला राज्यातच काम करायला आवडेल, असे सांगितले.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.