‘मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था लपून राहत नाही’

0
219

नवी दिल्ली, दि.१६ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी सरकारचं भरभरुन कौतुक केलं. ‘करोना परिस्थिती हाताळण्याबाबत उत्तरप्रदेश सरकार उत्तम कामगिरी करत आहे.’ असं म्हणत मोदींनी कौतुक केलं. योगी सरकारच्या योजना कशा जनतेच्या कल्याणासाठीच्या आहेत याबद्दलही पंतप्रधान बोलले. मात्र, यावरुन आता विरोधकांच्या पुढ्यात यामुळे आयटी संधी चालून आली आहे. आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याच मुद्द्यावरुन आता योगी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या कि, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही. मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचं क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही.’

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत उत्तरप्रदेश सरकारचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते की, करोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटं आली. करोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला.