मुख्यमंत्र्यांचा संवाद बोलाचीच कढी, म्हणतात…

0
161

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दारुची दुकाने उघडली मात्र मंदिरं उघडण्यास अजूनही परवानगी दिली नाही. दुसरीकडे लोकल सुरु करण्याची मागणी होत असताना आज उपासमारीने नागरिक हैराण आहेत. त्यावरही ठोस भूमिका घेतली नसल्याचे प्रविण दरेकर म्हणाले. शेतकऱ्यांनाही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना जनतेचा भ्रमनिरास केला आहे. मंदिरं उघडण्याची मागणी होत असताना एका बाजूला दारुची दुकाने उघडली जात आहेत. पण सरकार मंदिरे उघडणार नाहीत, असे सांगत आहे. यावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे बदलले वैचारिक स्वरुप राज्यातील जनतेसमोर आले आहे. लोकल सुरु करण्याची मागणी होत असताना आज उपासमारीने नागरिक हैराण आहेत. उद्योगधंदे बंद पडलेत. कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने मरणार की काय अशी परिस्थीती असताना लोकल ट्रेन सुरु करताना कुठलीही भूमिका घेतलेली नाही, यावरुन जनतेच्याबाबतची संवदेना दिसून येते, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. परंतु, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गेल्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर इतक्या महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती उध्दवस्त झाली आहे. पंचनामे झाले नाहीत. तो शेतकरी मदतीची वाट पाहत आहे, पण त्याला वाऱ्यावर सोडले आहे, अशी स्थिती असताना केवळ शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे बोलून चालत नाही. केवळ बोलाची कडी व बोलाचाच भात यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते. उक्ती व कृती याचा फरक यामधून दिसतोय.