जालना, दि. २३ (पीसीबी) – मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. व्हिडिओमध्ये छेडछाड करून खोडसाळपणे समाजमाध्यमावर चुकीचे वृत्त पसरवले जात आहे, असा खुलासा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गो हत्येविषयी केला आहे.
दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुस्लिम वस्ती असलेल्या कठोडाबाजार येथे काही दिवसांपूर्वी दानवे यांची एक छोटेखानी सभा झाली. दानवे यांनी या सभेत आपल्या खास ग्रामीण शैलीत भाषण केले. या भाषणाचा व्हिडोओ व्हायरल झाल्यानंतर दानवे अडचणीत आले आहेत. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.
या व्हिडिओमध्ये दानवे अवैध धंदे, सरकारी धान्याच्या काळाबाजाराची पाठराखण करीत असल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचताना ते गो हत्येच्या निर्णयाबद्दलही बोलले आहेत. त्यासाठी बकरी ईदच्या वेळचा एक प्रसंग सांगतानाही ते दिसत आहेत. बकरी ईदच्या वेळी मुस्लिम समाजातील काही लोक आपल्याकडे कत्तलीवरील बंदीची तक्रार घेऊन आले होते. रावसाहेब दानवे असेपर्यंत काहीही बंद होणार नाही, असे मी तेव्हा त्यांना म्हणालो होतो, अशी आठवण ते मतदारांना देत आहेत.