“मानवी जीवनात झाडांचे स्थान अनन्यसाधारण!” – पुरुषोत्तम सदाफुले

0
209

पिंपरी,दि.१०(पीसीबी ) : “झाडे ही सजीव असतात. मानवी जीवनात झाडांचे स्थान अनन्यसाधारण असल्याने प्रेम अन् आत्मीयतेने झाडांचे संगोपन केले पाहिजे!” असे विचार महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी ‘झाडांची दिवाळी’ या अतिशय अनोख्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. स्मशानभूमी म्हटली की दु:ख आणि वैराग्य या भावना मनात दाटून येतात; परंतु दिलासा संस्था, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि सावित्रीच्या लेकींचा मंच या तीन संस्थांनी एकत्र येऊन पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीतील झाडांची आकर्षक रंगरंगोटी करून तसेच पणत्या आणि आकाशकंदील प्रज्वलित करून ‘झाडांची दिवाळी’ हा अभिनव उपक्रम साजरा केला. पिंपरी-चिंचवड महापालिका ड प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगरसेविका चंदा लोखंडे, ह.भ.प. शारदा मुंडे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, मधुश्री ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या मीरा कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र मगदूम यांना आदरांजली वाहण्यात आली. सावित्रीच्या लेकींचा मंच या संस्थेच्या अध्यक्ष रविना अंगोळकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांनी पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या स्वप्निल खाडे, दिलीप शंकरपाळे, वसंत चव्हाण, विठ्ठल देवकर या कर्मचाऱ्यांना सुरेश कंक लिखित ‘झाड बोलाया लागले’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या छोटेखानी कविसंमेलनात कवी शरद शेजवळ यांच्या,
“शब्दधन आले, प्रतिभा प्रतिष्ठान आले
सावित्रीच्या लेकी ‘दिलासा’
देऊनिया सामील झाले
झाडांच्या दिवाळीत सारे
रंगुनिया गेले!”
या गेय कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली. आय.के. शेख, संगीता झिंजुरके, फुलवती जगताप, तानाजी एकोंडे, विजया नागटिळक या कवींनी सहभाग घेतला.

सागर अंगोळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “पर्यावरणाचे संतुलन राखून प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे!” असे मत मांडले. कार्यक्रमाच्या संयोजनात सुभाष चव्हाण, निशिकांत गुमास्ते, रामचंद्र प्रधान, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले; तर शामराव सरकाळे यांनी आभार मानले.