मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ जोडप्यांचा मोफत भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

0
630
पुणे, दि.११ (पीसीबी) –खोट्या प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च करून विवाहसोहळा साजरा करण्याची एक चुकीची परंपरा समाजामध्ये रूढ होत चालली आहे. समाजामधून ही परंपरा हद्दपार करून समाजाला वेगळी दिशा आणि एक चांगला संदेश देण्याचे काम यावेळी मोफत सामुदायिक विवाहसोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले. 
सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विष्णूआप्पा नारायण हरिहर आणि नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर यांच्या वतीने  मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा वर्धमान सांस्कृतिक केंद्र आईमाता मंदिरापुढे, कोंढवा-गंगाधाम रोड, बिबवेवाडी येथे १० ते १२ हजार लोकांच्या उपस्थितीत ताटामाटात संपन्न झाला.
या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूआप्पा हरिहर यांनी आपले बी ई सिव्हिल असलेले चिरंजीव राहुल हरिहर यांचा विवाह नुकताच अतिशय साधेपणाने साजरा करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या विवाहसोहळ्यासाठी अनावश्यक खर्च न करता त्याच पैशांमधून  या भव्य सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
या विवाहसोहळ्यात सहभागी एकूण १४ जोडप्यांबरोबर चिरंजीव राहुल हे देखील आपली पत्नी सौभाग्यवती डॉक्टर सानिका हिच्यासमवेत सहभागी झाले. या विवाहसोहळ्यासाठी १४ नववधूंना मणीमंगळसूत्र, वधुवरांना भरजरी पोशाख, संपूर्ण यथोचित धार्मिक विधी आणि उपस्थितांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या विवाहसोहळ्याचा  खर्च स्वतः हरिहर  परिवाराच्या वतीने केला गेला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर,  आमदार सिद्धार्थ शिरोळे,  माजी आमदार योगेश टिळेकर,  माजी आमदार महादेव बाबर,  भाजप महा. सरचिटणीस योगेश गोगावले,   खादी ग्रामोद्योग संचालक विद्यासागर हिरमुखे,  डीसीपी पौर्णिमा गायकवाड,  नगरसेविका आरती कोंढरे,  सम्राट थोरात, तेजेंद्र कोंढरे  आदी राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.