मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो ; महामुंबई मराठा समाज मोर्चाचा इशारा  

0
1011

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. लाठीचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. तसेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागावी, या मागण्या येत्या दोन दिवसांत मान्य न केल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा महामुंबई मराठा समाज मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.  

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) विधानभवनात सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. मराठा आरक्षणाचा चिघळत चालणाऱ्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह विशेष विमानाने दिल्लीतून मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीपूर्वी अमित शाह आणि राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुंबईतील आरएसएस कार्यालय यशवंत भवन येथे ही बैठक झाली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलनामुळे तणावाचे वातावरण आहे.  मागील दोनपासून राज्यभरात तुरळक घटना वगळता मराठा आंदोलन शांततेत सुरू आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी बोलावल्या बैठकीत काय निर्णय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.