महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कडक कारवाई करून अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना गरजेच्या

0
236

पुणे, दि.३० (पीसीबी) – राज्यातील पुणे, संभाजीनगर (औरंगाबाद), रत्नागिरी येथील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कडक कारवाई करून अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना गरजेच्या असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. राज्यचे पोलीस महासंचालक यांना त्याबद्दल एक पत्र त्यांनी नुकतेच दिले आहे. पोलीसांना सर्वच घटनेत अतिशय संवेदनशील पद्धतीने काम केले असून गुन्हे नोंदवून घेण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी पीडित कुटुंबाचे समुपदेशन देखील केले आहे याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

मागील दोन ते चार दिवसात महिलांवर व मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. यात संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालकाने विनयभंग केल्याने पिढीत मुलीने रिक्षातून उडी टाकली त्यात ती जखमी झाली आहे. जिन्सी पोलीस ठाण्यात दि.२८ ऑगस्ट, २०२१ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेतील आरोपीला अतिशय तत्परतेने कारवाई करून अटक पोलिसांनी केली आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलींग करून वारंवार तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे समोर आले आहे. याघटनेत चिंचवड पोलीस ठाण्यात दि.२४ ऑगस्ट, २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी हे अल्पवयीन असून येथील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.

पुणे शहर हद्दीतील दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे अंतर्गत गतिमंद महिलेवर चारही आरोपींनी अत्याचार केला आहे. चारही आरोपी अटक करण्यात आली असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात दि.२६ ऑगस्ट, २०२१ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून पुढील प सूचना केल्या आहेत. यात राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या या महिला अत्याचाराबाबतच्या संबंधीत कनिष्ठ तपास अधिकारी यांना मार्गदर्शन करुन आरोपी त्यांच्याविरुध्द परिपूर्ण तपास करुन दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे असे सदरील निवेदन डॉ.गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.

पॉस्कोच्या घटनेत निकाल लागण्यासाठी विलंब लागत असल्याने विधी व न्याय विभागाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर आरोपींना जामीन मिळणार नाही या दृष्टीने कृपया उचित कार्यवाही करण्यात यावी. सदरील सर्व घटनांतील पीडितेला मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी उचित आणि त्वरित कार्यवाही करावी अशी सूचना करून स्वतः लक्ष घालण्यात यावे असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले आहे. यासंदर्भातील अहवाल उपसभापती कार्यालयास लवकर पाठविण्याची विनंती देखील केली आहे.

अशा घटनेमुळे अतिशय धक्का या पीडित महिलांना आणि मुलींना बसला असल्याचे समोर येत आहे त्यामुळे यांचे त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यासाठी योग्य पावले उचलावीत. तसेच दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीना जामीन मिळणार नाही व दोषसिध्दचे प्रमाण 100 टक्के होईल या दृष्टीने उपाय योजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगाराविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी, छेडछाड विरोधी पथके कार्यान्वीत करण्यात यावीत, महिला दक्षता समित्यांच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात. उपरोक्त नुसार केलेल्या कार्यवाहिचा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवावा अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक यांना दिलेल्या पत्रात केली आहे.