अण्णा हजारे यांचा इशारा, मंदिरे उघडा अन्यथा आंदोलन

0
263

अहमदनगर, दि. ३० (पीसीबी) – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करत राज्य सरकारला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिरे उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याबाबत माहिती दिली. यावेळी समिती सदस्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णांनी आपण समितीने केलेल्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे, दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाही का ? असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. ज्या मंदिरातील दर्शनाने सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले.

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल असंही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार , नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन करत आहे. मात्र दुसरीकडे राजकीय पक्षांचे मेळावे, यात्रा यांना नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. मग गर्दी न करण्याचा नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांचा का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

दरम्यान देशातील आणि राज्यातील मंदिरं आणि आणि देवस्थान यांच्यावर अवलंबून असणारे छोटे मोठे व्यावसायिक देखील मंदिरं उघण्याची मागणी करत आहेत, दरम्यान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या मागणीला पाठींबा दर्शवला आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.