महाराष्ट्रात ‘या’ वयोगटातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस

0
319

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.

दरम्यान, लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे. या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.