मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून ‘या” पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

0
222

मुंबई,दि.०५(पीसीबी) – मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीबाबत 5 सदस्यीय घटनापीठासमोर 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून पाच वकिलांची फौज तयार करण्यात आली आहे.

“एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर करण्यात येत आहे. या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे”, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान “येत्या 9 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा”, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्याचबरोबर “पाच वकिलांची समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून राज्य सरकारच्या वकिलांना माहिती देईल”, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.