भाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली माहीत – अजित पवार

0
556

पुणे, दि. ३ (पीसीबी) – भाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली मला माहित आहेत. जे लोक भाजपमध्ये गेले आहेत, ते कशासाठी गेले हे मी नाव घेऊन सांगेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (बुधवार) येथे म्हटले आहे. आताचे राज्यकर्ते शेतकऱ्यांना लावारीस म्हणतात.  हनुमानाची जात काढतात, शेतकऱ्यांना साले म्हणतात.  त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, असा हल्ला त्यांनी भाजपवर चढवला. 

बारामती उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी नरपतगिरी चौकात सभा घेत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी सभेत बोलताना पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

यावेळी पवार म्हणाले की, आमच्या पक्षात काय चाललंय हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील.  पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबियांची चिंता न करता समाजाची करावी.  मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा गरीबांना न्याय देण्याची भुमिका घेतली असती, राफेल विमान खरेदीची शंका डोक्यातून काढली असती, तर  बरे झाले असते, असा टोला पवार यांनी यावेळी लगावला.