वाशिम, दि. २० (पीसीबी) – जे पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने खुप काही दिले. पूर्वी निष्ठा होती परंतु आता निष्ठेला महत्व राहिलेले नाही. जाणाऱ्यांना भीती, प्रलोभने दाखवली जात आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो. विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते, ते आज घडत आहे, अशी टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
वाशिम येथे पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, तुम्ही पाच वर्षात चांगले काम केले असेल, तर यात्रा कशासाठी काढता ? पाच वर्षांत राज्याला या सरकारने कंगाल करुन टाकले आहे. ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. सरकारकडून निव्वळ आश्वासने दिली जात आहेत. सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली आहे. तसेच गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे सगळे संपवायचे असेल, तर आघाडीला निवडून दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपने नवीनच पद्धत अवलंबली आहे. ते निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा अंदाज बघतात आणि त्यांना गोळा करत आहेत. हे लोकशाहीला मारक आहे लोकशाहीचा गळा घोटणारे आहे, असे पवार म्हणाले.