बीड मध्ये राष्ट्रवादी बॅकफूटवर, जयदत्त क्षिरसागर यांचे वर्चस्व

0
443

बीड, दि. २३ (पीसीबी) : ग्रामपंचायत निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनी धोबी पछाड दिल्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर प्रचंड बॅकफूटला गेले आहेत. पराभवामुळे नैराश्यात गेलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडून नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीत एकही अर्ज सादर करण्यात आला नाही. त्यामुळे स्थायी समितीवर भारतभूषण क्षीरसागर यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. आधीच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या हातून स्थायी समितीचीही सत्ता गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बीड मतदारसंघाचा नवा चेहरा म्हणून आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. मात्र वर्षभरातच संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा कौल समजून घेता आला नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा दणका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी पराभूत झालेले काका जयदत्त क्षीरसागर यांचं पारडं बीडमध्ये जड होताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पुतण्याला धूळ चारत जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे. काल शुक्रवारी बीड नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होती. नगरपालिकेत काका- पुतणे आमनेसामने आहेत. संदीप क्षीरसागर यांच्याकडून नगरपालिकेच्या स्थायी समितीवर रस्सीखेच होईल अशी जाणकारांना अपेक्षा होती. मात्र संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडून एकही अर्ज आला नसल्याने काका भारतभूषण क्षीरसागर यांचं वर्चस्व कायम राहिलं. ग्रामपंचायत निवडणुकीत अपयश आल्यानंतर संदीप क्षीरसागर हे जेरीस आल्याची चर्चा या निमित्ताने मतदारसंघात सुरू आहे.

समित्यांवर वर्चस्व

नगरपरिषदेत अश्विनी गुंजाळ यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती, विनोद मुलूक यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, शेख इलियास यांच्याकडे पाणीपुरवठा, सुशीला नाईकवाडे यांच्याकडे अर्थ व नियोजन, सुभद्रा पिंगळे यांच्याकडे विद्युत समिती, भास्कर जाधव यांच्याकडे शिक्षण व क्रीडा समिती तर स्थायी समितीमध्ये विकास जोगदंड, शेख मोहंमद खालेद व फारुख पटेल यांची निवड झाली आहे. या निमित्ताने जयदत्त क्षीरसागर यांचेच नगरपरिषदेतील समित्यांवर वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे.