फडणवीस ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे अधिवेशनात भडकले; अजित पवारांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश; अशी आहे ‘ती’ पोस्ट

0
369

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला. थेट सरकारच्या नैतिककेवरच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवल्यामुळे अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यासंदर्भात खुलासा करावा लागला आणि अखेर फडणवीसांची मागणी मान्य करावी लागली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी वाचून दाखवलेली देवेंद्र फडणवीसांवरच आरोप करणारी एक व्हायरल पोस्ट या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत ठरली.

जळगावच्या शासकीय वसतिगृहात झालेल्या गलिच्छ प्रकारावर विधानसभेमध्ये चर्चा झाली असता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांवर झालेले आरोप फेटाळत असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. ६ वरीष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे वसतिगृह प्रशासनाला क्लीनचिट सुद्धा दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,“उस्मानाबादमध्ये हनुमान चौकात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने सुसाईड नोटमध्ये केला आहे”, असं फडणवीसांनी म्हणताच नाना पटोलेंनी यावर एक व्हायरल पोस्ट वाचून दाखवली. “फडणवीसांबद्दलचीही एक पोस्ट व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका तृतीयपंथीशी खोटे आश्वासन देऊन अनैतिक संबंध ठेवले असल्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. अशा पोस्ट व्हायरल होत असतात”, असं नाना पटोले म्हणताच या मुद्द्यावरून भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली.

तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. “माझे मित्र नाना भाऊ यांचा मी आभारी आहे. त्यांनी चांगल्या भावनेतून त्या पोस्टविषयी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या चिंचवडमधल्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. याची तक्रार देखील करण्यात आली आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात काहीही लिहिलं तरी त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने लिहितो आणि त्यावर कारवाई केली जात नाही. या सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी केली. मात्र यावर प्रतिक्रिया देत “कार्यकर्ता कुणाचाही असो, त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर आजच्या आज कारवाई केली जाईल आणि त्याला अटक केली जाईल”, असा विश्वास आणि आश्वासन अजित पवारांनी दिल्यानंतर विरोधकांचं समाधान झालं आणि ते शांत झाले.