धुळे, दि. २१ (पीसीबी) – दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याने गावकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या शहादा तालुक्यातील वीरगाव येथील सरपंच तरुणीने ‘आधी लग्न पाणीटंचाईचे’ असा संकल्प करीत, विहीर खोदल्यानंतरच स्थळे आणा असे नातेवाइकांना बजावले आहे. अलका नीलसिंग पवार असे या जिगरबाज तरुणीचे नाव आहे. मार्चपासून ती श्रमदान करून आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी धडपडत आहे. तिने यासाठी गावाजवळील नाल्यात गावकऱ्यांच्या मदतीने विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे.