नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आगामी क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर भारताचा कर्णधार विराट कोहली यांने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत सरकार आणि बीसीसीआय जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे कोहलीने म्हटले आहे.
विशाखापट्टणमध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी (दि.२३ ) पहिला टी२० सामना खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलत होता. विराट कोहली म्हणाला की, पुलवामा हल्ला दु:खद घटना असून आम्ही देशासोबत आहोत. शहीद जवानांना कुटुंबीयांचे मी आणि माझा संघ सांत्वन करतो.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याचबरोबर विश्वचषकात पाकिस्तान आणि भारत यांच्या मध्ये १६ जून रोजी मॅन्चेस्टरमध्ये सामना होणार आहे. या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.