दौंड, दि. १२ (पीसीबी) – राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर महिला किंवा पुरूष असणे महत्त्वाचे नाही. जी व्यक्ती मुख्यमंत्री होईल, ती संवेदनशील असणे, गरजेचे आहे. राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यास मला अजिबात स्वारस्य नाही. मी पक्षाकडे लोकसभा लढवण्यासाठी तिकीट मागितले आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे बोलताना स्पष्ट केले.
दौंड येथे खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. पहिली महिला मुख्यमंत्री अशा प्रतिकात्मक पदांवर माझा अजिबात विश्वास नाही, असे त्या म्हणाल्या.
खासदार सुळे म्हणाल्या की, लोकसभा सभापतींनी माझ्या संसदीय कामाचे कौतुक केले आहे. दिल्लीमध्ये मी सर्वात क्रियाशील खासदार म्हणून काम करत आहे. महिला मुख्यमंत्री झाल्याने महिलांचे सर्व प्रश्न सुटतात असे काही नाही. राजस्थानात महिला मुख्यमंत्री होत्या म्हणून ते राज्य छेडछाड मुक्त राज्य झालेले नाही. निर्णयप्रक्रियेच्या मोठ्या पदांवरील व्यक्तींची निवड करताना लिंगभेदात अडकू नये, असे मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.