…तर डॉन अमित शहांना कोल्हापुरात फिरू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

0
969

कोल्हापूर, दि. १२ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी आता एफआरपीवरून भाजप अध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केले आहे. तुमचे डॉन अमित शहा यांना कोल्हापूरात फिरू द्यायचे असेल, तर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा, असा इशाराच शेट्टी यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.

कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्डात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेट्टी बोलत होते.

ते म्हणाले की, साखर कारखानदार शेतकऱ्याला एफआरपी देण्यास टाळाटाळ  करत  आहेत. कमी दरात वीज खरेदी करून शेतकऱ्यांना महाग दरात विकली जात आहे, त्याचा हिशेबही करण्यास नकार देत आहेत.  या वाढीव वीज दरवाढीविरोधात येत्या २१ जानेवारीला शिरोली पुलाजवळ महामार्ग रोको करण्यात येणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने सहभागी होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य सरकारला कळण्यासाठी आंदोलन तीव्र छेडले जाईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असून खतावर जीएसटी लावण्यात आला आहे. उत्पादनात घटत होत चालली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातच वीज दरवाढीचे संकट शेतकऱ्यावर  टाकले जात  आहे, असे शेट्टी म्हणाले.