पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचं काय? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले उत्तर

0
306

मुंबई, दि.४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्य सरकार गुंडाळणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर हा मुद्दा समोर आला होता. दरम्यान, दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भविष्याविषयी भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारचे काम विकास करणे आहे. बरोबर आहे… अलीकडेच मी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. कामे सुरू आहेत हेही खरे आहे की. काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे… जरूर दिली आहे. मला नेहमी असं वाटते की, पैशाचा जो मघाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय ताबडतोबीने गरजेचे आहे. नुसते आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा… किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचे आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या.. पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचे, हे काही योग्य नाही,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. बुलेट ट्रेनचे काय?,’ असा उलट प्रश्न राऊत यांनी केला. त्यावर ठाकरे म्हणाले, “बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असे वाटते. याच्यावरती सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते,” असं उत्तर ठाकरे यांनी दिली. राऊत यांनी ‘पण ते तर प्रधानमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे,’ असं ठाकरे यांना सांगितले. त्यावर “असेल. बरोबर आहे, पण हे ड्रीम प्रोजेक्ट जरी असलं तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते. स्वप्न नसते,” अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.