नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’– शिवसेना खासदार विनायक राऊत यांची टीका

0
242

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. भाजपने त्यांना राज्य कार्यकारिणीतही स्थान दिलेले नाही. या माध्यमातून भाजपने राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, नारायण राणे यांचे काम केवळ बोलघेवडेपणाचे आहे. कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं तसं शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने त्यांना पछाडलेले आहे. भाजपनेही राज्य कार्यकारिणीत स्थान न देऊन नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे राऊत यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांमध्ये नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पूत्र सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांना कोरोनामुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती हाताळता येत नाही. त्यामुळे मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराची दुर्दशा झाली आहे. राज्यात अन्यत्रही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.