“दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य मिळालं. आपला मुख्यमंत्री झाला. आपण करेक्ट कार्यक्रम करून दाखवला”

0
421

नाशिक, दि.२० (पीसीबी) : शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य मिळालं. आपला मुख्यमंत्री झाला. आपण त्यांना करेक्ट कार्यक्रम करून दाखवला’, अशा शब्दात त्यांनी फटकेबाजी केली आहे. नगरसेवक डि. जी. सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. ते काय कमी आहे का? आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. यांना काय जमतं असं काही लोक म्हणत होतं. पण आम्ही करून दाखवलं. आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला ना, असं सांगतानाच हे सगळं राजकारणात होत असतं. राजकारण हे काही साधुसंतांचं नाही. राजकारण हे चांगल्या कामाचं आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचं आहे, असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यावरूनही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यावर मोदींना वाटलं माघार घेतली पाहिजे. 1947ला स्वातंत्र्यासाठी मोठं आंदोलन झालं. चले जावचा नारा घुमला. अख्खा देश रस्त्यावर उतरला. तेव्हा ब्रिटिशांना वाटलं आपण पळून गेलं पाहिजे. तसंच काल झालं. त्यांना वाटलं आता आपण पळून गेलं पाहिजे. नाही तर जनता रस्त्यावर उतरेल आणि बघणार नाही कोण पंतप्रधान आहे आणि कोण गृहमंत्री आहे. हा शेतकऱ्यांचा विजय झाला. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, असं ते म्हणाले.

नाशिक हा आपला बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात तर तुम्ही लोकप्रिय आहात. तुम्ही प्रचंड कामे केली आहेत. त्यामुळे उद्या या वॉर्डात पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी डीजी सूर्यवंशी तुम्हीच निवडून याल, असं राऊत म्हणाले. नाशिकमध्ये मनपा निवडणूक आहे.100 च्या खाली नगरसेवक देणार नाही असं इथले नेते सांगत आहेत. जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस 10 नगरसेवकांचा मालक आहे. आपली सेंच्युरी नक्की आहे, असं त्यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेकांना जमिनीवर आणण्याची आवश्यकता आहे. यापेक्षाही मोठा कार्यक्रम झाला असता पण पोलिसांनी परवानगी दिली नाही, असं सांगतानाच अमरावतीमध्ये काही झालं म्हणून नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली नाही. अमरावतीत झालं ते नाशिकला कधीच होणार नाही. कोणी आलं अंगावर की शिंगावर घेण्याचं आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं, असंही ते म्हणाले.