नागपूर, दि. ५ (पीसीबी) – दुसऱ्यांचे पक्ष फोडाफोडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. आता परिस्थिती बदलली आहे. पवार यांच्या नेतृत्त्वावर त्यांच्या लोकांचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ते पक्ष सोडत आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
भाजपमध्ये आघाडीतील नेत्यांना आयात करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला. राष्ट्रवादीचे फक्त चार आमदार भाजपमध्ये आले आहेत. या आमदारांची कोणत्याही प्रकरणात चौकशी सुरू नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे. विरोधकांची जागा आता छोट्या संघटनांनी घेतली आहे. पक्षांची धोरणे व विचार वाईट असू शकतात. पण प्रत्येक पक्षात काही चांगले लोक असतात. अशा चांगल्या लोकांना घेण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी नेत्यांच्या भाजप प्रवेशावर केला.