नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – कश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने मोदी सरकारने अमरनाथ यात्रा मध्येच थांबवली आहे. काश्मीरमध्ये नक्की काय घडणार याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सांगू शकतील, असे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
दहशतवादविरोधी कारवाईसाठी अत्यंत कठोर पावले उचलण्यासाठी ही तयारी असेल तर सरकारने त्यासाठी बेशक पुढे जायला हवे. कश्मीरचा प्रश्न आता चर्चा किंवा संवादाने सुटेल या भ्रमातून बाहेर पडायला हवे. कश्मीरचा प्रश्न आता सैनिकी कारवाईनेच सुटेल व ती वेळ आता आली आहे. स्वातंत्र्यदिनाची पहाट १५ ऑगस्टला उगवेल तेव्हा कश्मीरच्या गावागावांतले हिरवे फडके उतरवून तिथे तिरंगा फडकवायला हवा. पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावरून कश्मीरबाबत काय घोषणा करतात ते ‘३५–ए’ हटवतात की ३७० कलम उडवून कश्मीर खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या नकाशावर आणतात याविषयी उत्सुकता आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले .