“दुसरा गाल दिल्याने दान मिळते, स्वातंत्र्य नाही”: अभिनेत्री कंगना रनौत

0
220

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला आहे. त्याच्या मथळ्यात असे लिहिले आहे की, ‘तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक… तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. आता ते तुम्हीच ठरवा.’ तिने पुढे लिहिले की, ‘दुसरा गाल दिल्याने दान मिळते, स्वातंत्र्य नाही.’

कंगनाने लिहिले की, ‘ज्यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती, पण सत्तेची भूक होती अशांनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांच्या स्वाधीन केले.’ ती पुढे म्हणाली, ‘आपल्याला कोणी एका गालावर थप्पड मारली, तर दुसरा गाल पुढे करा, आणि त्यामुळेच तुम्हाला स्वातंत्र्य मिळते, असे त्यांनीच आम्हाला शिकवले. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळत नाही, अशी भिक्षा मिळू शकते. तुमचे हिरो हुशारीने निवडा.’

पद्मश्री पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली की, ‘गांधींनी भगतसिंग किंवा सुभाषचंद्र बोस यांना कधीही पाठिंबा दिला नाही… भगत सिंग यांना फाशी द्यावी अशी गांधीजींची इच्छा होती याचा पुरावा… त्यामुळे तुम्ही कोणाला पाठिंबा देता हे निवडणे आवश्यक आहे…” अलीकडेच अभिनेत्री कंगना रनौतने नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले आणि 2014 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तर 1947 मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते, असे बोलून नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. या टीकेनंतर कंगनाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘मी स्पष्टपणे सांगितले आहे की, 1857ची क्रांती ही पहिली स्वातंत्र्य लढा होती, जी दडपली गेली आणि परिणामी ब्रिटिशांचे अत्याचार आणि क्रूरता वाढली आणि सुमारे शतकानंतर आम्हाला गांधीजीच्या भांड्यात भीकरुपी स्वातंत्र्य दिले गेले.’

सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कंगनाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक स्टोरी टाकून तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘1947 मध्ये नेमके काय घडले, हे कोणी सांगितल्यास ती पद्मश्री पुरस्कार परत करेल.’ तिने एका कात्रणाचा फोटो टाकून लिहिले आहे की, सर्व काही अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे. 1857मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहीत आहे, पण 1947 मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहिती नाही.’