दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी; फडणवीस अमित शाहांच्या भेटीला पोहचले; चर्चांना जोर

0
260

नवी दिल्ली, दि.०९ (पीसीबी) : गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आता सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह आणि फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे खासदार रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीत येण्याविषयीचं कारणही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.