‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’; भाजपचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न

0
194

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल अटी शर्थींसह सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबाबात घोषणा करताच भाजप आमदार नितेश राणेंनी जास्त वेळ न दवडता मुख्यमंत्र्यांना डिवचणारं ट्विट करुन मुंबई लोकल सुरु होण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना झुकवल्याचं त्यांनी एकप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला.

येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होणार आहे. मात्र त्यासाठी काही अटीशर्ती असणार आहेत. मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेले असणं जरुरीचं आहे. तसेच दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेले असणं आवश्यक आहे, असा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनातून जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं सर्वसामान्य मुंबईकरांनी स्वागत केलं, तसं राजकीय पक्षांनीही स्वागत केलं. भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे भाजपच्या आंदोलनाचं फलित, असं दाखवून देणारं ट्विट केलं.

“ये लगा सिक्सर… मुंबई भाजपच्या आंदोलनाला यश…येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होतीय… ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!”, असं ट्विट करुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हे ट्विट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना टॅग केलं.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. त्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांची दैना होत होती. अनेक वेळा मागणी करुनही शासन यावर निर्णय घेत नव्हते. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या संतापाला भाजपने रस्त्यावर येऊन वाट मोकळी करून दिली. मुंबईआणि ठाण्यात भाजपचे नेते, आमदार व कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरले. प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा यांनी जोरदार आंदोलन केले. लसीकरणानंतर सगळीकडे प्रवासाला परवानगी आहे, मग लोकलमध्ये का नाही?, असा सवाल उपस्थित करत लोकल सुरु करण्याची मागणी भाजपने केली होती.यादरम्यान मुंबई-ठाण्यात भाजपने मोठं आंदोलन छेडलं. अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.